मुंबई : कित्येक दिवस चाललेल्या चर्चांच्या फैरींनंतर एका रात्रीत महाराष्ट्राच्या राजकारणाने अचानक दिशा बदलली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. आज सकाळी (२३ नोव्हेंबर) या दोन्ही नेत्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. आता राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली आहे.
२४ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यात भाजप सर्वाधिक जागा मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला; मात्र शिवसेनेने पहिल्या दिवशीपासूनच आपल्यासाठी सगळे मार्ग खुले असल्याचे वक्तव्य करायला सुरुवात केली. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, हीच भूमिका संजय राऊत आणि शिवसेनेने लावून धरली होती. त्यानंतर कोणताही पक्ष बहुमत सिद्ध करू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर चर्चांच्या अनेक फेऱ्यांनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाविकासआघाडी सरकार स्थापन होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले.
दरम्यान, आजची सकाळ उजाडली ती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या बातमीने. राज्याला स्थिर सरकार देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे दोन्ही नेत्यांनी या वेळी सांगितले. भाजपला हा पाठिंबा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने दिला आहे, हे नंतर स्पष्ट झाले. लवकरच बहुमत सिद्ध करू, असे या दोन्ही नेत्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.
अॅप, फेसबुक, यू-ट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप